चंद्रपूर जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या शिवनी चोर गावातील घाटावर अवैध रेती तस्करीने जोर धरला असून, रात्रौच्या वेळी जेसीबी, हायवा आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे.सध्या राज्यभरातील रेती घाटांवर बंदी असतानाही शिवनी चोर घाटावर ही बंदी पूर्णतः धाब्यावर बसवून रेती तस्करांचे सत्र सुरू असल्याचे चित्र आहे. या अवैध तस्करीमुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, धूळ, आवाज आणि अपघाताचा धोका वाढला आहे.गावकऱ्यांनी अनेकदा महसूल विभाग व पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, नागरिकांच्या मते काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची तस्करांशी संगनमत असल्यामुळे तस्करीला अभय मिळत आहे.या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली असून, “या तस्करीमुळे आमचा जीव टांगणीला लागला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी,अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.












